Type Here to Get Search Results !

नांदुरा रेल्वे गेट -ही केवळ ट्रॅफिकची समस्या नाही, ही जनतेच्या सहनशीलतेची परिक्षा आहे.

 नांदुरा. आझाद पठाण 

नांदुरा रेल्वे गेट – ही केवळ ट्रॅफिकची समस्या नाही, ही जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा आहे!






नांदुरा रेल्वे गेटचा हा फोटो पाहताना तुम्हाला पहिल्यांदा वाहतुकीची ताटातूट दिसेल, पण खरं चित्र त्याहून खोल आहे. हे केवळ बंद रेल्वे गेटमुळे थांबलेली वाहतूक नाही, ही थांबलेली आहे इथल्या जनतेची प्रगती, तिचा संयम, तिचा वेळ... आणि दुर्दैवाने, प्रशासनाची जबाबदारीसुद्धा!


दिवसातून किती वेळा हा गेट बंद राहतो, याचा नेमका आकडा सांगणं शक्य नाही. कारण तो गेट उघडतो आणि पुन्हा क्षणातच बंद होतो. एकीकडे शाळकरी मुलं उन्हात रस्त्याच्या कडेला थांबलेली असतात, तर दुसरीकडे रुग्णवाहिका हॉर्न वाजवत अडकलेली असते. वाहनांच्या रांगेचा शेवट दिसेनासा होतो, आणि लोकांच्या मनातला संयम संपून जातो.


दर निवडणुकीला एकच वादा – “उड्डाणपूल होणार!”


प्रत्येक राजकीय पक्षाच्या घोषणापत्रात एक मुद्दा हमखास दिसतो – इथे उड्डाणपूल उभा राहणार. पण प्रश्न आहे कधी? आजवर किती सरकारं आली-गेली, पण गेट तसाच उभा आहे – बंद दरवाज्यासारखा. इथं राजकारणी लोक माईक लावून भाषणं देतात, पण सामान्य नागरिकांच्या यातनांचा आवाज त्यांच्या कानांपर्यंत पोहोचतच नाही.


हे फक्त गाड्यांचं नव्हे, तर लोकांचं आयुष्य थांबवणारं संकट आहे.


शाळा, ऑफिस, दवाखाना, बाजार – प्रत्येक ठिकाणी पोहोचणं ही लॉटरी झाली आहे. कारण गेट उघडा की बंद, हेच माहित नसतं. कित्येक वेळा परीक्षा चुकल्या, मुलाखती हुकल्या, आणि काही रुग्णांचा उपचाराआधीच श्वास थांबला… आणि हे सगळं का? एका उड्डाणपुलाच्या प्रतीक्षेमुळे!


घोषणांची गरज नाही, कामाची गरज आहे.


जनतेने आता 'होणार' हे ऐकणं थांबवलं आहे. आता 'झालं' पाहिजे. हा लेख, हे फोटो – हे सगळं यासाठीच, की एकदा तरी प्रशासन, राजकारणी आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहतील.


नांदुराकडून आता एकच आवाज – उड्डाणपूल हवा… आणि तो लवकरात लवकर हवा!

युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण समाजवादी पार्टी

Post a Comment

0 Comments